मुंबई- महाराष्ट्रात भाजप-सेनेचे सरकार येणार हे आता नक्की झालं आहे.चर्चा अशी आहे की,नव्या सरकारात शिवसेनेचे 14 मंत्री असणार आहेत .या चौदात कोकणाला किती प्रतिनिधीत्व मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे.कोकणात शिवसेनेला सात जागा मिळाल्या आहेत.किमान तीन ठिकाणी सेनेचा निसटता पराभव झाला आहे.या उलट भाजपला पनवेलची केवळ एकच जागा मिळाली आहे.त्यामुळ नव्या रचनेत कोकणातील भाजपला प्रतिनिधीत्व मिळण्याची फारच कमी शक्यता आहे.भाजप प्राधान्यानं मुंबई आणि विदर्भाला झुकते माप देईल .आठ पैकी आठ जागा भाजपच्या झोळीत टाकणाऱ्या पुण्याचाही विचार भाजपला करावा लागेल.शिवसेना मात्र कोकण,मुंबई,ठाणे,मराठवाड्य़ाचा प्राधान्यानं विचार करेल अशी शक्यता आहे.कोकणातील सात आमदारांपाकी एक किंवा दोघांना लाल दिवा मिळू शकतो.सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर किंवा नारायण राणे यांचा पराभव करून जायंन्ट किलर ठरलेले वैभव नाईक या दोघांपैकी एकाचा तळ कोकणातून विचार होऊ शकतो. सिंधुदुर्गला मंत्रीपद देऊन शिवसेना नारायण राणे यांच्या अस्तित्वालाच सुरूंग लावण्याचा प्रय़त्न करू शकते.दुसरं मंत्रीपद द्यायचं ठरलंच तर राजापूरचे राजन साळवी किंवा महाडच्या भरत गोगावले यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. रत्नागिरीचे उदय सामंत अनुभवी आहेत पण ते नुकतेच राष्ट्रवादीतून सेनेत आलेले असल्याने त्यांच्या नावाला स्थानिक पातळीवरच विरोध होऊ शकतो.रायगडात सेनेला चांगली संधी आहे पण समर्थ नेतृत्वामुळे सेनेत विस्कळितपणा आलेला आहे.पेण,श्रीवर्धन,कर्जतमध्ये सेनेत झालेल्या बंडखोरीनं हे दिसून आलंय.अशा स्थितीत भरत गोगावले यांना मंत्रीपद देऊन रायगड सेना भक्कम कऱण्याचा प्रय़त्न सेना नेतृत्व करू शकते.मंत्रीपद कोणाला मिळेल हा भाग वेगळा असला तरी मोदी लाटेतही कोकण पूर्णपणे सेनेबरोबर राहिल्याने सेना नेतृत्व कोकणाला झुकते माप देऊन कोकणात सेना अधिक मजबूत कऱण्याचा प्रयत्न सेना नेतृत्व करू शकते.कोकणात भाजप नाही,आणि राष्ट्रवादी तसेच कॉग्रेस गलितगात्र झाली आहे.बऱ्याच दिवसांनी अशी संधी सेनेला मिळाली असल्याने सेना ती वाया जाऊ देणार नाही हे नक्की.