महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत,ज्येष्ठ पत्रकार मा.गो.तथा बाबुराव वैद्य यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं त्याचा नक्कीच आम्हाला आनंद आहे.मा.गो.वैद्य 17 वर्षे तरूण भारतचे संपादक होते.या काळात तरूण भारतच्या अग्रलेखांची दखल सत्ताधारी देखील घेत.तरूण भारत हे पत्र एका विशिष्ठ विचारांना वाहिलेले असले तरीही त्यानी तरूण भारतला लोकाभिमूक करण्यात मोठीच भूमिका बजावली.संपादकपदावरून निवृत्त झाल्यानंतरही त्याचं लेखन सुरूच होतं.घ्येयवादी पत्रकारिता काय असते हे मा.गो.वैद्य यांनी जगाला दाखवून दिलं आहे.त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ते बरोबर आहे,’मराठी पत्रकार परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार प्रतिष्ठेचा आहेच पण मा.गो.वैद्य यांना हा पुरस्कार दिल्यानं या पुरस्काराची उंची कित्येक पटीनं वाढली आहे’.बाबुराव वैद्य यांनी पत्रकारितेत मोठं कार्य केलेलं असतानाही पत्रकारितेनं त्यांची दखल घेतली नाही.मराठी पत्रकार परिषदेनं त्यांना दिलेला पुरस्कार हा पत्रकारितेतला पहिला पुरस्कार असल्याचं सांगितलं जातंय.हे खरं असेल तर आम्ही स्वतःला नक्कीच भाग्यवान समजतो की,एका ःऋुषीतुल्य पत्रकाराचा सत्कार करण्याची संधी आम्हाला मिळाली.बाबुराव वैद्य याचं वय सध्या 94 वर्षाचं आहे.ते सपत्नीक पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित राहिले आणि त्यांनी आमचा पुरस्कार स्वीकारला ही आमच्यासाठी नक्कीच महत्वाची गोष्ट आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या समारंभास उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद.महाराष्टा्रच्या वेगवेगळ्या भागातून हजारावर पत्रकार कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रम देखणा झाला.
गेल्या वर्षी परिषदेनं आणखी एक तपस्वी पत्रकार दिनू रणदिवे यांचा सत्कार केला.यंदाचा कार्यक्रम होऊ नये म्हणून जश्या काही शक्ती सक्रीय होत्या तश्याच गेल्यावर्षीचा कार्यक्रम होऊ नये म्हणून काहीजण मा.उध्दवजी ठाकरे यांच्या घरी जावून तळ ठोकून बसले होते.पण या विरोधाला न जुमानता उध्दवजी आले आणि तो कार्यक्रमही देखणा झाला.दिनू रणदिवे यांना पुरस्काराची 25 हजारांची रक्कम तर आम्ही दिलीच त्या व्यतिरिक्त 67 हजारांची थैलीही आम्ही दिली.ही रक्कम किंवा त्याना पुरस्कार देऊ नये म्हणून अनेकांनी विरोध केला परंतू समाजातील चांगुलपणा जिवंत राहिला पाहिजे,ज्या व्यक्ती इतरांसाठी आयुष्य जगल्या त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे या भावनेतून आम्ही विरोध झुगारून देत दिनू रणदिवे यांचा सत्कार केला.दिनू रणदिवे आणि मा.गो.वैद्य यांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळावी याचाआनंद नक्कीच आहे.(SM )